आदिवासींच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठविणारे गुजरातमधील भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनसुख वसावा यांनी मंगळवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे.

नर्मदा जिल्ह्यातील १२१ गावांना पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं होतं. वने, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने त्याबद्दल जारी केलेली अधिसचूना मागे घ्यावी अशी मागणी मनसुख वासवा यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याकडे एका पत्राच्या माध्यमातून केली होती. या अधिसुचनेमुळे या १२१ गावांमधील आदिवासींकडून उठवला जाणारा आवाज तसेच निषेधाचा प्रभाव कमी करण्याचा हेतू असल्याचे सांगण्यात येत आहे. ५ मे २०१६ रोजी स्कुल्पनेश्वर अभयारण्य आणि आजूबाजूच्या गावांना संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा जी अधिसूचना वने, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने जारी केली होती त्याचा वसावा यांनी विरोध केला होता.

भडोच मतदारसंघाचे सहावेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या वसावा यांनी गुजरात भाजपाचे अध्यक्ष सी. आऱ. पाटील यांनाही पत्र पाठवले आहे. आपल्या चुकांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी आपण राजीनामा देत आहोत. आपण पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ता आहोत. कृपया आपल्याला माफ करावे, असे वसावा यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभा अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर आपण लोकसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देणार असल्याचे वसावा यांनी पत्रात म्हटलं आङे. पक्षाशी एखनिष्ठ राहण्याचा आणि आयुष्यात पक्षाची मूल्ये आत्मसात करण्याचा आपण सदैव प्रयत्न केला. आपण माणूस आहोत. माणसाकडून चुका होतात, असाही उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे.

(Source: Lok Sabha archives)

भाजपाचे प्रदेश प्रवक्ते भरत पंड्या यांनी वसावा यांचा राजीनामा प्रसारमाध्यमांद्वारे पक्षाकडे आला आहे. ते पक्षाचे ज्येष्ठ खासदार असून पक्ष त्यांचे सर्व प्रश्न सोडवेल असं आश्वासनही पंड्या यांनी दिलं.