पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यातील ठाकोर समुदयाचा एक विचित्र निर्णय समोर आला आहे. दांतीवाडामध्ये अविवाहित मुलींच्या मोबाइल वापरावर बंदी घालण्यात आली आहे. जर अविवाहित मुलीने मोबाइल वापरला तर वडिलांना दीड लाखांचा दंड भरावा लागणार आहे. एकीकडे जगभरात स्त्री-पुरूष समानतेच्या गोष्टी बोलल्या जात आहे. काही क्षेत्रात तर मुलींनी मुलांनाही मागे टाकले आहे. मात्र, गुजरातमधील ठाकोर समुदायाची विचित्र गोष्ट समोर आली आहे.

गुजरातमधील दांतीवाडामधील ठाकोर समुदायाने हा नवीन नियम केला आहे. ज्यामध्ये अविवाहित मुलीच्या मोबाइल वापरावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. तसेच आंतरजातीय विवाहावरही बंदी घालण्यात आली आहे. जर ठाकोर समुदयातील मुलीने इतर जातीच्या मुलासोबत लग्न केल्यास दीड लाखांचा दंड द्यावा लागणार आहे. ठाकोर जातीमधील मुलाने इतर जातीच्या मुलीसोबत लग्न केल्यास दोन लाखांचा दंडाचा नियम करण्यात आला आहे.

१४ जुलै रविवारी जगोल गावात झालेल्या ठाकोर समुदयाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला ठाकोर समुदयातील ८०० नेत्यांचा सहभाग होता. या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयाला ठाकोर समाजातील लोक संविधानाप्रमाणे मानतात. त्यानुसार, अविवाहित मुलीने मोबाइल वापरण्याचा गुन्हा केल्यास दंड म्हणून वडिलांना दीड लाख रूपये द्यावे लागणार आहेत.

जिल्हा पंचायत समितीचे सदस्य जयंतीभाई ठाकोर म्हणाले की, रविवारी आमच्या जमाजाने सर्वांच्या संहमतीने हे निर्णय घेतले आहेत. लग्नात होणारा अतिरिक्त खर्चांवर निर्बंध घालण्यासाठी डिजे आणि फटाके वापरण्यावर बंदी घालण्यात आली पाहिजे. यामधून आर्थिक बचत होऊ शकते. अविवाहित मुलींच्या मोबाइल वापरवार बंदी घालण्याच्या निर्णयावर दहा दिवसानंतर पुन्हा बैठक होणार आहे. जर मुलींनी कुटुंबीयांच्या मनाविरूद्ध लग्न केल्यास गुन्हा मानला जाणार आहे.

कोटडा, गागुडा, ओडवा, हरियावाडा, मारपुरिया, शेरगढ, तालेपुरा, रानडोल, रतनपुर, दनारी आणि वेलावास गावांमध्ये ठाकोर समुदयाचे हे नवे नियम लागू करण्यात आले आहे.