पतीच्या सततच्या पानमसाला खाण्याच्या सवयीला वैतागलेल्या पत्नीने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशमधील प्रतापगड जिल्ह्यात एका विवाहितेने आपल्या पतीला सोडून दिले असून ती आता माहेरी गेली आहे. विशेष म्हणजे दोघांचे १५ दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. हे प्रकरण आता पोलीस ठाण्यात गेले आहे.

प्रतापगडमधील कंधई पोलीस ठाण्याच्या अंतर्गत राहत असलेले नवदाम्पत्य पानमसाल्यामुळे वेगळे झाले आहेत. पानमसाल्यामुळे दोघांमधील वाद पराकोटीला पोहोचला. अखेर ही बाब पंचायतीपर्यंत पोहोचली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पतीला पानमसाला खाण्याची सवय होती. नवविवाहितेला हे अजिबात पसंत नव्हते. तिने पतीला पानमसाला खाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, चिडलेल्या पतीने तिला मारहाण केली.

त्यांचे भांडण पंचायतीपर्यंत पोहोचला. पंचायतीने त्यांना समजवून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, हा वाद काही मिटला नाही. पंचायतीच्या सांगण्यावरूनही पत्नी आपल्या पतीबरोबर राहण्यास तयारी झाली नाही. महिलेने पंचायतीतच न राहण्याचा आपला निर्णय सांगितला व माहेरी निघून गेली.