कराचीतील विमानतळावर हल्ल्याबाबत पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी नरेंद्र मोदी सरकारवर केलेल्या टीकेचा भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर वाईट परिणाम होणार नाही, असे केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले.
‘जमात उद दावा’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याने ‘ट्विटर डॉट कॉम’ या ब्लॉगिंग संकेतस्थळावर असा आरोप केला होता की, मोदी यांचे नवीन सुरक्षा पथक कराचीतील जिना विमानतळावरील हल्ल्यामागे आहे. या हल्ल्यात १० दहशतवाद्यांसह तीस जण ठार झाले आहेत. सुरक्षा दलांनी आज सकाळी या विमानतळाचा ताबा सुरक्षा दलांनी घेतला होता.
सईद याने केलेल्या विधानाचा दोन्ही देशातील संबंधांवर परिणाम होईल काय, असे विचारले असता राजनाथ सिंग म्हणाले की, दोन्ही देशातील संबंध बिघडणार नाहीत. पाकिस्तानातील काही शक्तींना अलीकडे पंतप्रधान मोदी व त्यांचे समपदस्थ नवाझ शरीफ यांची झालेली भेट पसंत पडली नाही. त्यामुळे त्यांच्यातील काही शक्तींनी दोन्ही देशातील संबंध बिघडवण्यासाठी हे वक्तव्य केले असावे. भारताला पाकिस्तानशी सौहार्दपूर्ण संबंध असायला हवेत असेच  आम्हाला वाटते.