भीमा कोरेगावमध्ये जो हिंसाचार उसळला त्याला त्यामागे हिंदुत्त्ववादी संघटना होत्या असा आरोप होतो आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही पत्रकार परिषदेत हा आरोप केला. अशातच आता या प्रकरणातल्या दोषींना कठोरातली कठोर शिक्षा झाली नाही तर हिंदूंच्या घरातही हाफिज सईद जन्माला येतील अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी भोपाळमध्ये केली.

मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये महात्मा फुले परिषदेतर्फे माजी खासदार सुखलाल कुशवाह यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत एक भाजपविरोधात लाठी रॅली आयोजित करण्यात आली होती. त्या लाठी रॅलीला प्रकाश आंबेडकरांचीही हजेरी होती. यानंतर झालेल्या भाषणात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. या कार्यक्रमात समाजवादीचे नेते शरद यादव यांचीही उपस्थिती होती. देशातील मागासवर्गीय, दलित बांधव आणि आदिवासींनी सरकारविरोधात एकत्र आले पाहिजे असेही आवाहन या मंचावरून करण्यात आले.

महाराष्ट्र सरकारच्या इशाऱ्यावरूनच पोलिसांनी दोषींना सोडून पीडितांवर कारवाई केली. ही सगळी कारवाई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर होते आहे असाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. आंबेडकरांनी त्यांच्या भाषणात महाराष्ट्र सरकारला भीमा कोरेगावच्या दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. ही मागणी जर मान्य झाली नाही तर हिंदूंच्या घरातही हाफिज सईद जन्माला येतील हे विसरू नका असा इशाराही त्यांनी दिला. तसेच मागास समजल्या जाणाऱ्या जातीच्या बांधवांनी सरकारविरोधात एकत्र यायला हवे असेही आवाहन यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केले.

गुजरातमध्ये जर काँग्रेसने आदिवसी बांधवांपर्यंत त्यांचा अजेंडा पोहचवला असता तर भाजपच्या हातून काँग्रेसने सत्ता हिसकावून घेतली असती. मात्र तसे घडले नाही असेही आंबेडकर यांनी म्हटले. तसेच भीमा कोरेगावमध्येही २०० वर्षांपूर्वी महारांच्या सैन्याने पेशव्यांची दाणादाण उडवली होती कारण पेशवे स्पृश्य-अस्पृश्य असा भेद मानत होते. ज्या महार बांधवांनी लढाई केली ते हिंदू नव्हते का? असाही प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केला. सरकारने जर दोषींना पाठिशी घातले तर त्यांच्यावर वचक कोण बसवणार? असा प्रश्न यावेळी शरद यादव यांनी उपस्थित केला.