गुजरातमधील पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल तब्बल २० दिवसांपासून बेपत्ता असल्याचा दावा त्यांच्या पत्नी किंजल पटेल यांनी केला आहे. १८ जानेवारीपासून हार्दिक पटेल बेपत्ता असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. शिवाय, गुजरात सरकार हार्दिक पटेल यांना लक्ष्य करत असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.

हार्दिक पटेल यांना देशद्रोहाच्या प्रकरणात १८ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. मात्र, ते सध्या कुठं आहेत, अशी विचारणा आपल्याकडे पोलिसांकडूनच होत असल्याचेही किंजल म्हणाल्या आहेत. भाजपामध्ये गेलेल्या अन्य दोन नेत्यांवर अशी कारवाई का होत नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. हार्दिक पटेल यांनी लोकांना भेटावं अशी गुजरात सरकारची इच्छा नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

पाटीदार आरक्षण समर्थनार्थ २५ ऑगस्ट २०१५ रोजी हार्दिक पटेल यांनी अहमदाबाद येथे एक रॅली काढली होती. त्यानंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला. त्यावेळी पोलिसांनी हिंसाचाराप्रकरणी हार्दिक आणि सहकाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.