दिल्लीतील निर्भयाप्रकरणासारखीच घटना हरयाणातील जिंद जिल्ह्यात घडली आहे. १५ वर्षांच्या मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. पीडित मुलीवर अमानूष अत्याचार केल्याचे समोर आले असून या प्रकरणामुळे हरयाणात संतापाची लाट उसळली आहे.

कुरुक्षेत्रमध्ये राहणारी १५ वर्षांची मुलगी १० वी इयत्तेत शिकते. ९ जानेवारीपासून ती बेपत्ता असून गावातील २० वर्षांचा तरुणही त्याच दिवशी घरातून निघून गेला. त्यामुळे हे दोघेही पळाले असावे, असा संशय मुलीच्या आई-वडिलांना आला. त्यांनी संबंधित तरुणाविरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली होती.

शुक्रवारी जिंद येथील कालव्यात एका मुलीचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. पोलीस तपासात हा मृतदेह कुरुक्षेत्रमधील १५ वर्षांच्या मुलीचा असल्याचे स्पष्ट झाले. रविवारी रोहतकमधील वैद्यकीय महाविद्यालयात पीडित मुलीचे शवविच्छेदन करण्यात आले. पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे. गुप्तांग आणि शरीराच्या अन्य भागांवरील जखमा पाहता नराधमांनी तिच्यावर अमानूष अत्याचार केल्याचे उघड झाले. या प्रकरणी  पोलीस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखाली चार तपास पथके स्थापन करण्यात आली असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या घटनेमुळे हरयाणात संतापाची लाट उसळली आहे. पीडित मुलगी ही दलित समाजातील असून ज्या तरुणाविरोधात अपहरणाची तक्रार दाखल झाली तो देखील याच समाजातील आहे. तो संशयित आरोपी असला तरी त्यानेच हे कृत्य केले आहे का याबद्दल ठोस पुरावा मिळालेला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

[jwplayer tjVIDUcp]

पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता. प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, मुलीच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी आणि आई-वडिलांना आर्थिक मदत द्यावी, अशी त्यांची मागणी होती. शेवटी हरयाणातील मंत्री के के बेदी यांनी मुलीच्या नातेवाईकांची भेट घेतली. बेदींनी कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

हिसारमध्ये सहा वर्षांच्या मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच कुरुक्षेत्रमधील घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहे.