वन डे सामन्यात दोन नव्या चेंडूंचा वापर करण्याच्या नियमाला मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने कडाडून विरोध दर्शवला आहे. एक दिवसीय सामन्यात दोन नव्या चेंडूंचा वापर म्हणजे गोलंदाजांना उद्ध्वस्त करण्यासाठी उचलेले पाऊल आहे असे सचिन तेंडुलकरने म्हटले आहे. ट्विटरवर सचिनने आपली नाराजी व्यक्त केली आहे. वन डे मध्ये दोन चेंडू म्हणजे गोलंदाजांच्या अपयशाला आमंत्रण आहे असेही त्याने स्पष्ट केले आहे. विराट कोहलीनेही सचिनचे म्हणणे योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे.

मंगळवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरोधात ५ वनडे मालिकेतील तिसऱ्या वन डे सामन्यात ६ गडी गमावत ४८१ धावा केल्या. वनडे सामन्यांच्या इतिहासातली ही सर्वाधिक धावसंख्या आहे. यानंतरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ बाद ३१२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचे हे आव्हान इंग्लंडने ४४.४ षटकांतच पूर्ण केले. सचिन तेंडुलकरने याबाबतही ट्विट करत वन डे सामन्यात दोन नवे चेंडू वापरणे म्हणजे गोलंदाजांच्या अपयशाला आमंत्रण देण्यासारखे आहे असे म्हटले आहे.

आयसीसीने ऑक्टोबर २०११ मध्ये दोन नव्या चेंडूंचा वापर करण्यास प्रयोग सुरु केला. मात्र मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने याचा विरोध केला आहे. दरम्यान पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनूसनेही सचिनची बाजू घेत याच कारणामुळे क्रिकेटमध्ये नवे जलदगती गोलंदाज तयार होत नाहीत असे म्हटले आहे.

वन डे सामन्यात चेंडू रिव्हर्स स्विंग करण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. डेथ ओव्हर्समध्येही आम्ही रिव्हर्स स्विंग पाहिलेला नाही. टीम इंडियाचा कप्तान विराट कोहलीनेही ही बाब मान्य केली आहे धावपट्टी सपाट असल्याने दोन नवे चेंडू हे गोलंदाजांसाठी आव्हानच ठरणार आहे. एक फलंदाज म्हणून मला हे गोलंदाजांसाठीचे आव्हान वाटते आहे असे विराट कोहलीने म्हटले आहे.