भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील बैठक रद्द झाल्यानंतर आता पुढील महिन्यांत दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची दिल्लीत बैठक होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पाकिस्तानचे रेंजर्स यांच्यात ही बैठक होणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
सदर बैठकीची पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून दोन्ही देश एकमेकांच्या संपर्कात आहेत, असे वृत्त दी एक्स्प्रेस ट्रिब्यूनने दिले आहे. सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तान रेंजर्स यांच्यातील ही द्वैवार्षिक बैठक आहे. सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक आणि पाकिस्तान रेंजर्सचे महासंचालक यांच्यात ९ ते १३ सप्टेंबर या कालावधीत बैठक होणार आहे. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या या बैठकीत समन्वय राहावा यासाठी दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींची वाघा सीमेवर मंगळवारी एक बैठक घेण्यात आली. दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील बैठक रद्द झाल्यानंतर प्रथमच ही उच्चस्तरीय बैठक होणार आहे.
जवानांच्या हल्ल्यात दहशतवादी ठार
श्रीनगर- उत्तर काश्मीरमध्ये उरी भागात सीमारेषेवर दहशतवादी आणि लष्करी जवानांमध्ये झालेल्या गोळीबारात एका दहशतवाद्याचा मृत्यू झाला आहे. सकाळी सात वाजता लष्करी जवान उरी भागात गस्तीवर असताना येथे सशस्त्र दहशतवादी आढळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या हल्ल्यात ठार झालेला दहशतवादी कुठल्या संघटनेचा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोराकडून एके-४७ रायफलही हस्तगत करण्यात आली आहे. अखेरचे वृत्त हाती आले, तेव्हाही जवान आणि दहशतवाद्यांधील गोळीबार सुरूच होता.