करोना व्हायरसच्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करताना हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि अ‍ॅझीथ्रोमायसीन या गोळयांचा कोर्स दिला जातो. करोनाची सौम्य तसेच कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांवर हे कॉम्बिनेशन प्रभावी ठरल्याचे आतापर्यंत दिसले आहे. पण लवकरच या औषधाच्या वापरामध्ये बदल होऊ शकतो.

करोनामुळे प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांवर एचसीक्यू आणि अ‍ॅझीथ्रोमायसीन या कॉम्बिनेशनने उपचार करण्यासंबंधी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून लवकरच सुधारित मार्गदर्शतत्वे जारी केली जाण्याची शक्यता आहे. नव्या उपचार पद्धतीमध्ये एचसीक्यू कायम राहिल पण अ‍ॅझीथ्रोमायसीनचा वापर बंद केला जाऊ शकतो. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) करोना रुग्णांवर उपचारांसाठी ही दोन औषधे सुचवली होती. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- समजून घ्या, सहजपणे… भारतातील कोविड विरोधी औषधांचा वापर

दिल्लीतील एम्स रुग्णालय करोना रुग्णांवर नव्या प्रोटोकॉलनुसार उपचार करत आहे. उपचारांची नवीन मार्गदर्शतत्वे लवकरच सार्वजनिक केली जातील. करोनावरील उपचारामध्ये एचसीक्यू गोळीचा वापर कायम राहिल पण अ‍ॅझीथ्रोमायसीनच्या जागी दुसरे औषध दिले जाऊ शकते.

“एचसीक्यूसह अ‍ॅझीथ्रोमायसीनच्या वापरामुळे ह्दयावर परिणाम होत असल्याने या गोळीचा वापर थांबवला पाहिजे. त्याच्याजागी डॉक्सीसायक्लीन किंवा अ‍ॅमॉक्सीसायक्लीन ही औषधे दिली पाहिजेत. यामुळे ह्दयावर कुठलाही परिणाम होत नाही” असे ICMR च्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. भारतात गंभीर करोना रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता जास्त भासत आहे.

आणखी वाचा- नकोसा विक्रम! २४ तासांत ११ हजारांचा टप्पा प्रथमच पार, एकूण करोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या पुढे

दिवसभरात रुग्णवाढ १० हजारांवर
देशात गेल्या चोवीस तासांमध्ये पहिल्यांदाच नव्या रुग्णांनी १० हजाराचा आकडा पार केला. गुरुवारी दिवसभरात १०,९५६ म्हणजे सुमारे ११ हजारच्या नजिक नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या २ लाख ९७ हजार, ५३५ झाली आहे. जागतिक क्रमवारीत आता भारत चौथ्या क्रमांकावर आला असून ब्रिटनला मागे टाकले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात समूह संसर्ग झाला नसल्याचा दावा केला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४९.४७ टक्के असल्याचेही सांगितले. १ लाख ४७ हजार १९४ रुग्ण बरे झाले असून १ लाख ४१ हजार ८४२ रुग्ण उपाचाराधिन आहेत.