kargil vijay diwas भारतीय जवानांचे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अनन्य साधारण महत्त्व आहे. ते सीमेवर उभे आहेत म्हणून आपण मोकळा श्वास घेऊ शकतो. शत्रूचे आक्रमण रोखण्यासाठी ते कायमच सज्ज असतात. कारगिलच्या युद्धाची आठवण म्हणून आणि भारतीय सैनिकांनी मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून २६ जुलैला विजय दिवस साजरा होतो. याच विजय दिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला कहाणी सांगतो आहोत अशा एका जवानाची जो या युद्धात शहीद झाला, मात्र त्याच्या नावे १९ वर्षांपासून एक अखंड ज्योत तेवते आहे.

ही कहाणी आहे शहीद सतवंत सिंग यांची. त्यांची आठवण आली की आजही त्यांच्या आई वडिलांचे डोळे पाणवतात. वयाच्या २१ व्या वर्षी सतवंत सिंग यांना कारगिल युद्धात वीरमरण आले. टायगर हिल्सवर विजय मिळवताना सतवंत सिंग देशासाठी शहीद झाले. सुखदेव कौर आणि कश्मीर सिंग ही त्यांची आई वडिलांची नावे आहेत. मुलाच्या आठवणी जागवताना या दोघांचेही डोळे भरून येतात. त्याच्या आठवणीत आजही या कुटुंबाकडून एक ज्योत तेवत ठेवण्यात आली आहे. सतवंत सिंग यांना कारगिल युद्धा दरम्यान मामून कँट या ठिकाणी धाडण्यात आले होते. या युनिटने जी संयुक्त मोहीम त्या मोहिमेत अनेक पाक सैनिक मारले गेले. यानंतर टायगर हिल्सजवळ मोहिम सुरु असताना सतवंत सिंग यांना वीरमरण आले.

सतवंत सिंग यांच्या पार्थिवावर जेव्हा अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हापासून आम्ही त्याच्या फोटोसमोर दिवा लावतो. मागील १९ वर्षांपासून हा दिवा आम्ही विझू दिलेला नाही. एवढेच नाही तर रोज जेव्हा घरात अन्न शिजवण्यात येते तेव्हा सतवंतच्या फोटोसमोर ताट ठेवल्याशिवाय हे कुटुंब अन्नग्रहणही करत नाहीत. शहीद सतवंत सिंग यांना त्यांच्या कुटुंबाने देवाचा दर्जा दिला आहे. ज्या जागी त्यांचा फोटो लावण्यात आला आहे ती जागा आमच्यासाठी मंदिर आहे असेच त्याचे कुटुंबीय सांगतात. पाच वर्षांपूर्वी सतवंत सिंग यांच्या गावातील पेट्रोल पंपावरही त्यांचा फोटो लावण्यात आला. या पेट्रोलपंपावर येणारे लोकही सतवंत सिंग यांच्या प्रतिमेला सलाम करतात. एक जवान जेव्हा देशासाठी शहीद होतो तेव्हा सगळा देश हळहळतो. त्याच्या कुटुंबावर तर दुःखाचा डोंगरच कोसळतो. तरीही सतवंत सिंग यांच्या कुटुंबाने त्यांना देव मानले आहे आणि त्यांच्या आठवणी जागवण्यासाठी एक ज्योत अखंड तेवत ठेवली आहे. जवानासाठी त्याच्या कुटुंबाने केलेला हा सर्वोच्च सन्मान आहे असेच म्हणावे लागेल.