येत्या ४८ तासात मुंबई, पुणे आणि नाशिक या तिन्ही प्रमुख शहरांमध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज मुंबईतला सर्वात उष्ण दिवस नोंदवला गेला, कारण आज मुंबईत पारा ४१ अंशावर होता. आज मुंबईतला सगळ्यात उष्ण दिवस नोंदवला गेला. याआधी २०११ मध्ये १७ मार्चला मुंबईचे तापमान ४१.३ अंशावर गेले होते. गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे तापमान ३३ किंवा ३४ अंशांवर आहे. मात्र आज हा पारा थेट ४१ वर पोहचल्याने मुंबईकरांना उन्हाच्या तीव्र झळा जाणवल्या. हवामान खात्याने पुढचे २४ ते ४८ तास असेच वातावरण राहिल असा अंदाज वर्तवला आहे. फक्त मुंबईतच नाही तर नाशिक आणि पुण्यातही उष्णतेची लाट जाणवेल असेही हवामान खात्याने म्हटले आहे. मुंबईत २८ मार्च १९५६ या दिवशी उष्णतेचा पारा ४१.७ अंशांवर पोहचला होता. येत्या दोन दिवसात कदाचित हा रेकॉर्डही मोडू शकतो असे मत स्कायमेट व्हेदरचे व्हाइस प्रेसिडंट महेश पलावत यांनी नोंदवले आहे. विदर्भात उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडलेलीच आहे अशात आता मुंबई, पुणे आणि नाशिक या तिन्ही शहरांमध्ये येत्या ४८ तासात उन्हाचा तडाखा बसणार आहे. स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान सध्या सर्वसाधारण आहे. उन्हाचे चटके अजून या भागांमध्ये बसायला सुरुवात झालेली नाही. मात्र येत्या काही दिवसांमध्ये या भागातही उन्हाचे चटके जाणवू लागतील असेही स्कायमेटने म्हटले आहे.