तामिळनाडूत ईशान्य मान्सूनच्या पावसाने थैमान घातले असून तेथे तीन दिवसांत किमान ७१ जण मरण पावले आहेत. आणखी तीन दिवस हा पाऊस राज्याला झोडपून काढणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. पावसाशी संबंधित घटनात आणखी १२ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती मुख्यमंत्री जयललिता यांनी दिली. त्यांनी मंत्रिमंडळ व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मृतांच्या नातेवाइकांना त्यांनी प्रत्येकी चार लाख रुपये भरपाई जाहीर केली आहे. पावसामुळे तामिळनाडूत जनजीवन विस्कळीत झाले असून पाणी साठलेल्या ठिकाणी दुकाने, शाळा बंद ठेवल्या आहेत. तमिळनाडू, पुडुचेरी व किनारी आंध्र प्रदेशात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
चेन्नई व उपनगरात रात्री जोरदार पावसाने नागरिकांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले. तामिळनाडूत बंगालच्या उपसागरात नैर्ऋत्येकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तो आता वायव्येकडे वळण्याची शक्यता असून किमान चोवीस तास कमी दाबाचा पट्टा कायम राहणार आहे.