केंद्र सरकारने पाचव्या लॉकडाउनची घोषणा केली असली तरी त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात शिथिलता आहे. लॉकडाउनच्या चौथ्या टप्याच्या अखेरीस देशात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन-चार दिवसांमध्ये प्रतिदिन सात हजाराने वाढणारी करोनाबाधितांची संख्या आज, रविवारी ८ हजारांच्या पुढे गेली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ८ हजार ३८० नवे रूग्ण आढळले असून ही एका दिवसातील सर्वात मोठी वाढ आहे.


मागील २४ तासांत देशात ८ हजार ३८० करोनाबाधित आढळले आहेत. तर १९३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या एक लाख ८२ हजार १४२ इतकी झाली आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत देशात पाच हजार १६४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत ११,२६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तब्बल ८६ हजार ९८४ जणांनी करोनावर मात केली आहे. तर ८९ हजार ९९५ जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४२ टक्क्यांवरून ४७.४ टक्क्यांवर गेले आहे. एका दिवसात हे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले. मात्र, गेल्या २४ तासांत मृत्यूची संख्याही सर्वाधिक आहे. रुग्णांच्या मृत्यूचा आकडा दोनशेहून म्हणजेच २६५ इतका आहे. करोनामुळे एकूण ४,९७१ मृत्यू झाले आहेत. गेल्या तीन दिवसांत मात्र रुग्णदुपटीचे प्रमाण १५.४ दिवसांवर पोहोचले आहे. मृत्यूचे प्रमाण २.८६ टक्के आहे.