म्होरक्या हरयाणात जेरबंद
महामार्गावर लुटालूट करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीस राजस्थान पोलिसांनी पकडले असून त्याच्या म्होरक्याला हरयाणातून जेरबंद करण्यात आले आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
या म्होरक्याचे नाव शेरू खान असे असून ही टोळी राजस्थान, हरयाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधील महामार्गावर लुटालूट करीत होती. खान याला हरयाणाच्या पालवल जिल्ह्य़ातील उतवारा गावांतून रविवारी अटक करण्यात आली, पोलीस महानिरीक्षक (जयपूर परिमंडळ) डी. सी. जैन यांनी सांगितले.
खान याच्या टोळीतील १५ जणांची ओळख पटली असून त्यांना हरयाणा पोलिसांच्या मदतीने लवकरच पकडण्यात येईल, असे जैन म्हणाले. शेरू खान याच्याकडून एक एसयूव्ही ताब्यात घेण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध जयपूर आणि अलवार जिल्ह्य़ात नऊ गुन्ह्य़ांची नोंद आहे, असेही ते म्हणाले. महामार्गावर दरोडे घालत असल्याची कबुली शेरू खान याने दिली असून आपल्या साथीदारांची नावेही सांगितली आहेत. जयपूर-दिल्ली, दिल्ली-मथुरा, जयपूर-अजमेर, जयपूर-दौसा, रेवारी गुरगांव या महामार्गावर ही टोळी सक्रिय होती. ही टोळी खासगी वाहनांमधून जाणाऱ्यांची गाडी अडवून त्यांच्याकडील दागिने आणि रोख रक्कम काढून घेत असे.