दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारनं देशातील शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी रब्बी हंगामातील शेतमालाच्या आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळातील फेरबदलाचे निर्णय होण्याची शक्यता होती. त्यामुळे याबैठकीकडं सगळ्याचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीत बीएसएनएल, एमटीएनएलला उभारी देण्याबरोबरच इतरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

आणखी वाचा- अडचणीत असलेल्या BSNL, MTNLचे विलिनिकरण होणार; मंत्रीमंडळाचा निर्णय

शेतकऱ्यांसाठीही केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतमालाच्या किमान आधारभूत मूल्यात सरकारने वाढ करत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यात रब्बी हंगामातील शेतमालाच्या दरात ८५ रूपयांची वाढ करण्यात आली असून, या वाढीनंतर गव्हाच्या किंमती क्विंटलमागे ८५ रूपयांची होणार आहे. त्यामुळे गव्हाच्या किंमती १८४० रूपयावरून १९२५ रूपये इतकी झाली आहे. शेतमालाच्या आधारभूत दरात वाढ केल्यामुळे सरकारवर ३ हजार कोटी रूपयांचा बोझा पडणार आहे.