मध्य प्रदेशातील ग्रामीण भागाला अहोरात्र विजेचा पुरवठा होत नसतानाही राज्य सरकारने विजेच्या दरात वाढ केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ‘अटल ज्योती’ योजनेखाली अहोरात्र विजेचा पुरवठा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते.
ग्रामीण भागांत विजेचा पुरवठा होत नसतानाही वाढीव दराने विजेची बिले पाठविण्यात येत आहेत. ‘अटल ज्योती’ या महत्त्वाकांक्षी योजनेखाली अखंडित पुरवठा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारने दिले असतानाही वीजपुरवठा करण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणक अग्रवाल यांनी म्हटले आहे.
विजेची वाढीव बिले भरणे ज्या शेतकऱ्यांना अशक्य आहे त्यांना अटक करून तुरुंगात डांबले जात आहे. विजेच्या वाढीव बिलांमुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्या आहेत, असेही अग्रवाल म्हणाले.