अयोध्येत राम जन्मभूमीवर मशीद बांधल्यास हिंदू असहिष्णू होतील असं भाजपा नेता आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी म्हटलं आहे. ‘हिंदू हा जगातील सर्वात जास्त सहिष्णू समाज आहे. माझी सर्व राजकारण्यांना विनंती आहे की, त्यांनी अयोध्येत राम जन्मभूमीवर मशीद बांधण्याची चर्चा करत हिंदूंना असहिष्णू करण्याचा प्रयत्न करु नये’, असं उमा भारती बोलल्या आहेत.

उमा भारती यांनी मंदिराच्या पायाभरणीसाठी काँग्रसे अध्यक्ष राहुल गांधी यांनाही निमंत्रित केलं आहे. असं केल्याने त्यांच्या पक्षाला पापांचं प्रायश्चित करण्याची संधी मिळेल असा टोला त्यांनी लगावला आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘मक्का, मदिना आणि व्हॅटीकन सिटीमध्ये मंदिर उभारलं जाऊ शकत नाही. तर मग अयोध्येत मशीद कशी काय बांधली जाऊ शकते’. अयोध्येतील वाद हा जमिनीचा असून श्रद्धेचा नाही आहे’, असंही उमा भारती यांनी म्हटलं आहे.

‘हा राष्ट्रीय हिताचा मुद्दा असून समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह, ममता बॅनर्जी, मायावती आणि डाव्या पक्षांनीही या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाला समर्थन दिलं पाहिजे’, असं मत उमा भारती यांनी व्यक्त केलं आहे. काँग्रेस श्रद्धेच्या मुद्द्यावर देशाचं विभाजन कऱण्याचा प्रयत्न करत होता असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.