साध्वी प्राची यांनी शाहरूख, आमिर खान व सलमान यांच्या चित्रपटांवर बहिष्काराचे आवाहन करून नवा वाद निर्माण केला आहे. तसेच हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची पोस्टर्स फाडून शेकोटी करावी, असा फतवा काढला आहे. विश्व  हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात त्यांनी याबाबतचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या टीकेतून मदर तेरेसाही सुटल्या नाहीत. त्यांनी धार्मिक सेवेच्या नावाखाली धर्मातराचे काम केल्याचा आरोपही प्राची यांनी केला.
अभिनेते आमिर खान, शाहरूख खान आणि सलमान खान हे हिंसक संस्कृती पसरवत असल्याचे साध्वी प्राची यांनी सोमवारी सूचित केले. त्यामुळे युवकांनी या त्रिकुटाला आपला आदर्श मानू नये, असा सल्लाही साध्वी प्राची यांनी दिला आहे. साध्वी म्हणाल्या की, एकदा मेरठमधील कार्यक्रमात आपण एका लहानग्याला, आयुष्यात तुला कोण व्हावयाचे आहे, असा प्रश्न विचारला. तेव्हा त्याने आपल्याला ऋतिक रोशन, आमिर खान, शाहरूख खान, सलमान खान व्हावयाचे आहे, असे सांगितले.
तुला त्यांच्यासारखे व्हावेसे का वाटते, असे विचारले असता त्याच्या आईने सांगितले की, ते साहसी दृश्ये चांगली करतात म्हणून आपल्या मुलास त्यांच्यासारखे व्हावेसे वाटते. खान आणि त्यांच्या चित्रपटांमुळे हिंसक संस्कृती वाढत चालली असल्याने तरुण पिढीने त्यांचा आदर्श मानू नये, असे साध्वी यांनी सूचित केले.
‘लव्ह जिहाद’बाबत प्रक्षोभक वक्तव्य
याआधीही साध्वी प्राची यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. लव्ह जिहादबाबत प्रक्षोभक वक्तव्य करतानाच हिंदू महिलांनी चार मुले जन्माला घालावी अशी मुक्ताफळे साध्वी प्राची यांनी उधळली होती. प्रेमपाशाच्या नावाखाली हिंदू मुलींना अडकवले जात आहे असे सांगून त्यांनी ‘घरवापसी’ मोहिमेचे समर्थन केले होते.