देश आज ७४ वा स्वातंत्र्यदिवस साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करत आहेत. या वेळी भाषणाच्या सुरुवातीला  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  सर्वप्रथम देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशवासीयांना अधिकाधिक आत्मनिर्भर होण्याचा यावेळी त्यांनी संदेश दिला. “स्वातंत्र्यदिनाच्या शुभ मुहुर्तावर देशवासीयांना खूप खूप शुभेच्छा, जय हिंद!” असं ट्विट करूनही पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्या दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदींबरोबरच गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गृहमंत्री अमित शाह यांनी “आपण सर्वजण मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचा संकल्प करू आणि भारतात निर्माण झालेल्या वस्तूंचा अधिक वापर करून, देशाला नव्या उंचीवर पोहचवण्यात आपले सर्वोच्च योगदान देऊ, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ” अशा शब्दात ट्वटिद्वारे देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा- LAC ते LOC पर्यंत कोणीही आमच्या सार्वभौमत्वाला आव्हान देऊ शकत नाही – पंतप्रधान मोदी

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केले. यानंतर ते देशवासीयांना शुभेच्छा देत म्हणाले की, “भारत आत्मनिर्भर बनल्या नंतर आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळेल, यासाठी आज आम्हाला भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प करण्याची आवश्यकता आहे.”

आणखी वाचा- करोना लसीबद्दल काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

आणखी वाचा- ‘मेक इन इंडिया’नंतर ‘मेक फॉर वर्ल्ड’, पंतप्रधान मोदींचा नवा नारा

“आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, १३० कोटी देशवासियांसाठी मंत्र बनला आहे. आत्मनिर्भर होणे अनिवार्य आहे. जे कुटुंबासाठी आवश्यक आहे. ते देशासाठी आवश्यक आहे. भारत आत्मनिर्भर बनून दाखवेल. मला देशाच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे. भारताने ठरवलं तर करुन दाखवतो. जगाला भारताकडून अपेक्षा आहे,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.