दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत. त्यांनी जबाबदारी स्वीकारुन तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. दिल्लीत झालेला हिंसाचार चिंतेचा विषय असून, केंद्राने जाणीवपूर्वक ७२ तासात कारवाई केली नाही असा आरोप काँग्रेसने केला आहे.

दिल्लीत झालेला हिंसाचार पूर्वनियोजित कटाचा भाग आहे. भाजपा नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे हा हिंसाचार उफाळला असा आरोप सोनिया गांधी यांनी केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्याची मागणी त्यांनी केली. केंद्राने कुठलीही कारवाई न केल्यामुळे हा हिंसाचार वाढला असा आरोप त्यांनी केला.

आणखी वाचा – परिस्थिती हाताबाहेर जातेय, लष्कराला बोलवा, अरविंद केजरीवालांची मागणी

मागच्या ७२ तासात दिल्ली पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबारात अनेक जण जखमी झाले आहेत. उत्तर पूर्व दिल्लीच्या रस्त्यावर हिंसाचार सुरु आहे असे सोनिया गांधी म्हणाल्या. केंद्राच्या बरोबरीने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि प्रशासनही या परिस्थितीला जबाबदार आहेत. केंद्रातल्या सर्वोच्च नेतृत्वाचे मौन पाहून धक्का बसला असे सोनिया गांधी म्हणाल्या.