बनावट चकमक प्रकरण आणि कामावर गैरहजर राहणा-या दोन महिला आयपीएस अधिका-यांवर केंद्रीय गृहमंत्रालयाने कारवाई केली आहे. उत्तराखंड कॅडरच्या आयपीएस अधिकारी ज्योती बेलूर आणि १९९१ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी मेरी लूई फर्नांडीस या दोघांना गृहमंत्रालयाने बडतर्फ केले आहे. उत्तरप्रदेशमधील गाझियाबाद जिल्ह्यातील भोजपूमधील बनावट चकमक प्रकरणात ज्योती बेलूर या आरोपी आहे. १९९६ मध्ये झालेल्या या चकमकीत पोलिसांनी ४ गुन्हेगारांना ठार मारल्याचा दावा केला होता. मात्र सीबीआय चौकशीमध्ये पोलिसांचा दावा खोटा होता असा खुलासा झाला. या बनावट चकमकीत पोलिसांनी मारलेल्या जसवीर या तरुणाच्या शरीरातून गोळी बाहेर काढण्यात आली होती. ही गोळी वेलूर यांच्या बंदुकीतून चालवण्यात आल्याचे समोर आले होते. न्यायालयाने या प्रकरणातील दोषी पोलिसांना बुधवारीच शिक्षा सुनावली आहे. तर वेलूर या अजूनही फरार असून त्यांच्या शोधासाठी सीबीआयने विशेष पथक तयार करावे असे निर्देश न्यायालयाने दिले होते. पोलीस पदक मिळवण्यासाठी पोलिसांनी चकमकीचा बनाव रचला होता. या प्रकरणात पोलिसांवर चार निर्दोष व्यक्तींची हत्या केल्याचा आरोप होता. पोलीस ठाण्याचा प्रभारी पोलीस निरीक्षक आणि चार पोलिसांसह आयपीएस अधिकारी ज्योती बेलूरचा आरोपींमध्ये समावेश होता. बेलूर सध्या देशाबाहेर असून त्या ब्रिटनमध्ये वास्तव्यास असल्याचे समजते. ब्रिटनमध्ये त्या सध्या एका पुस्तकाचे लिखाण करत असल्याची चर्चा आहे. ज्योती बेलूरसह माजी आयपीएस अधिकारी मेरी लूई फर्नांडीस यांच्यावरही गृहमंत्रालयाने बडतर्फीची कारवाई केली आहे. फर्नांडीस या २००५ पासून कामावर गैरहजर आहेत. सरकारला माहिती न देता त्या अमेरिकेत वास्तव्यास होत्या.