मुझफ्फरनगरमध्ये दंगल घडविण्यासाठी गुजरातधून शेकडो लोक आले होते, असा आरोप काँग्रेस नेते आणि केंद्रीय पोलादमंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी केला. भाजप आणि समाजवादी पक्ष यांची छुपी युती असल्याची टीका त्यांनी केली.
मुझफ्फरनगर दंगलीनंतर काही दंगलपीडितांशी पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेने संपर्क साधल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. त्यावरून गदारोळ सुरू असतानाच वर्मा यांनी राहुल यांचे समर्थन केले. त्यांनी काही लपवले नाही, ते हृदयातून बोलले, असे वर्मा म्हणाले. मुलायमसिंह यादव यांना उत्तर प्रदेशातील परिस्थिती सांभाळता येत नाही, ते आता पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहत आहेत, अशी खिल्ली वर्मा यांनी उडवली.
नरेंद्र मोदी यांनी जरी १००  वेळा माफी मागितली तरी, गुजरातमधील २००२ मधील जातीय दंग्यांबद्दल त्यांना माफी देता कामा नये, असे वर्मा यांनी स्पष्ट केले. गुजरातसाठी ते कलंक आहेत, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीकेची झोड उठवली.
मोदींनी  भूमिकेत बदल केल्यास त्यांना मत देईन, अशी मुस्लीम व्यक्तिगत कायदा मंडळाचे उपाध्यक्ष मौलाना कल्बे सादीक यांच्या वक्तव्यावर वर्मा यांनी प्रतिक्रिया दिली.