सोशल मीडियामुळे राजू आणि सुषमा एकत्र आले. ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात आणि विवाहात झाले. काही काळाने हाच सोशल मीडिया सुषमाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. सुषमाला सोशल मीडियाचे व्यसन लागले होते. ती घरकामांकडे दुर्लक्ष करुन जास्तीत जास्त वेळ स्मार्टफोनमध्ये घालवत असल्याने संतापलेल्या राजूने तिची हत्या केली. त्यानंतर राजूने त्यांच्या तीन महिन्यांच्या बाळालाही मारले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

बंगळुरुजवळच्या बिदादी येथे २० जानेवारी रोजी हे दुहेरी हत्याकांड घडले. रामनगरा जिल्हा पोलिसांनी एस.के.राजूला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुषमा आणि बाळाची हत्या केल्याची कबुली दिली. तीन महिन्यांच्या बाळाचे त्यांनी नामकरणही केले नव्हते.

सुषमा फेसबुक, इन्स्टाग्रामच्या पूर्णपणे आहारी गेली होती. घरकाम, स्वच्छतेकडे ती अजिबात लक्ष देत नव्हती. त्यामुळे आपण तिची हत्या केली असे राजूने सांगितले. सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे हत्या झाल्याचे आमच्या पाहणीत आलेले हे पहिले प्रकरण आहे. ग्रामीण भागात सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे काय घडू शकते त्याचे हे उदहारण आहे असे या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले.