हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही संशयित आरोपींना पोलिसांनी ठार केले आहे. गुन्हा घडल्याच्या ठिकाणी चौकशीसाठी नेले असता या चारही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीमध्ये या चौघांना ठार करण्यात आल्याची माहिती तेलंगण पोलिसांनी दिली आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या या एन्काउंटरच्या वृत्तानंतर सोशल मिडियावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. भाजपाच्या अनेक नेत्यांनी याबद्दल अद्याप प्रतिक्रिया दिलेली नसली तरी माजी क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटवरुन हैदराबाद पोलिसांचे कौतुक केले आहे. तसेच त्यांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचेही म्हटलं आहे.

राज्यवर्धन यांनी केलेल्या ट्विटमध्ये आपल्या देशात वाईटावर नेहमीच चांगल्या गोष्टीचा विजय होतो असं मत व्यक्त केलं आहे. “मी हैदराबाद पोलिसांचे आणि त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या नेतृत्वाचे अभिनंदन करतो. सर्वांना कळू द्या की आपल्या देशात चांगल्या गोष्टी नेहमी वाईट गोष्टींवर विजय मिळवतात,” असं ट्विट राज्यवर्धन यांनी केलं आहे. तसेच या ट्विटमध्ये त्यांनी एक इशाराही दिला आहे. “पोलिसांनी स्वसंरक्षमार्थ गोळीबार केला हे लक्षात घ्यायला हवं,” असं राज्यवर्धन ट्विटच्या शेवटी म्हणाले आहेत.

नक्की काय घडलं

आयपीएस अधिकारी असणाऱ्या व्ही. सी. सज्जनार यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री तीन ते पहाटे सहाच्या दरम्यान हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही संक्षयित आरोपींचा एन्काउंटर झाला. आरोपींनी पोलिसांच्या हातातील बंदूक घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना थांबण्याचा इशारा देण्यात आला. मात्र त्यांनी पोलिसांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी बचावसाठी केलेल्या गोळीबारीमध्ये या चौघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. काल (गुरुवारी) रात्री पोलिस चारही आरोपींना घटनास्थाळी घेऊन गेले होते. नक्की काय काय घडलं हे जाणून घेण्यासाठी त्यांना पोलिस बंदोबस्तामध्ये घेऊन जाण्यात आले होते. मात्र ज्यावेळी त्यांना काय घडलं हे सांगण्यासाठी मोकळं सोडण्यात आलं तेव्हा त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला.