सध्या चर्चेत असलेल्या हैदराबाद बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना शुक्रवारी मध्यरात्री ठार करण्यात आले. पोलीस एन्काऊंटरमध्ये हे चारही आरोपी ठार झाले. या चार आरोपींनी प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी घटनास्थळी नेण्यात आले होते. त्या वेळी त्या आरोपींनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पळून न जाण्याचा इशारा दिला होता, पण त्यांनी पळण्याचा प्रयत्न केल्यामुळे नाईलाजाने पोलिसांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्या चकमकीत चारही आरोपी ठार झाले.

बहुचर्चित प्रकरणातील चारही आरोपी पोलीस चकमकीत मारले गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर बहुतांश लोकांनी या कृत्याचे समर्थन केले, तर काहींनी याबाबत संशय व्यक्त केला. भारताची फुलराणी सायना नेहवाल हिने पोलिसांच्या या कृत्याला पाठिंबा दिला. “तुम्ही उत्तम काम केलंत. हैदराबाद पोलीस, तुम्हाला सलाम”, असे ट्विट करत तिने पोलिसांचे समर्थन केले.

नक्की काय झालं?

प्रकरणातील चारही आरोपींना अधिक तपासासाठी पोलिसांनी घटनास्थळी नेलं. त्यावेळी या आरोपींनी त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. पळून जाऊ नये असा इशारादेखील देण्यात आला, पण ते न थांबल्यानं पोलिसांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. शुक्रवारी पहाटे ३ ते ६ दरम्यान ही घटना घडली, अशी माहिती हैदराबाद पोलिसांकडून देण्यात आली.

पोलिसांशी झालेल्या चकमकीत आरोपी मारले गेले आहेत, ही घटना ऐकून आम्हाला धक्का बसला. पण या प्रकरणातील आरोपींना शासन मिळाल्याचा आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया पीडितेच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली.

संपूर्ण देशात या प्रकरणाबाबत संतापाची लाट होती. आम्ही मुख्यमंत्र्यांना फाशीच्या शिक्षेबद्दल विचारणा केली होती. त्यांना तातडीनं शिक्षा होणं गरजेच होतं. आरोपी पळून गेले असते, तर पुन्हा अशी घटना घडली असती. त्यामुळे बलात्कार प्रकरणातील प्रत्येक आरोपीला अशी शिक्षा होणं गरजेचं आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले.