हैदराबादमधील सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी समाजातील सर्व स्तरातून होत आहे. बलात्काराची ही घटना म्हणजे क्रूरतेचा कळस आहे. आरोपींनी कामावरुन घरी परतणाऱ्या महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या केली. नंतर निर्जन स्थळी नेऊन तिचा मृतदेह जाळला.

राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील चट्टनपल्ली गावात एका पूलाखाली आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावली. मृतदेह पेटवल्यानंतर आरोपी तिथून निघून गेले व पुन्हा काही वेळाने मृतदेह पूर्णपणे जळाला आहे की, नाही ते पाहण्यासाठी तिथे परत आले होते. पोलीस तपासातून ही माहिती समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने आरोपींनी हे कृत्य केले.

आणखी वाचा- महिलांविरोधी गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी कठोर कायदा करणार : संरक्षण मंत्री

आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चट्टनपल्ली गावातील पूलाखालची जागा निवडली.  आरोपींनी राष्ट्रीय महामार्ग ४४ वर शामशाबाद आणि शादनगर दरम्यान वेगवेगळया जागांची पाहणी केली होती. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जागेचा शोध सुरु असताना दोन आरोपी पुढे मृत महिलेची स्कूटर चालवत होते तर अन्य दोघे ट्रकमध्ये होते. महिलेचा मृतदेह ट्रकच्या केबिनमध्ये होता. स्कूटरवर असलेल्या दोघांनी दोन ते तीन जागांची पाहणी केली. पण तिथे वर्दळ असल्याने अखेर त्यांनी चट्टनपल्ली गावातील पूलाखालची जागा निवडली अशी माहिती या प्रकरणात तपास करणाऱ्या पोलिसांनी दिली आहे.

“आरोपींना जनतेसमोर ठेचून मारा”; जया बच्चन यांचा संताप
आरोपींना जनतेसमोर ठेचून मारलं पाहिजे, अशा शब्दांत समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार जया बच्चन यांनी हैदराबाद येथील घटनेवर संसदेत संताप व्यक्त केला. हैदराबाद येथे बलात्कार करून करून महिला पशुवैद्यकास पेटवून ठार करण्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद संसदेतही उमटले.

आणखी वाचा- “आरोपींना जनतेसमोर ठेचून मारा”; हैदराबाद घटनेवर जया बच्चन यांचा संताप

“निर्भया असो, कठुआ असो किंवा मग हैदराबादमध्ये घटलेली घटना असो, आता लोकांना सरकारकडून योग्य आणि निश्चित उत्तर हवंय. हैदराबादमध्ये ज्या दिवशी ही घटना घडली, त्याच्या एक दिवस आधी तिथेच एक दुर्घटना घडली. तिथल्या सुरक्षाकर्मींना प्रश्न विचारले गेले पाहिजेत. ज्या पोलिसांनी निष्काळजीपणा केला, त्यांची नावं जाहीर केली पाहिजेत. आरोपींना जनतेसमोर ठेचून मारलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया जया बच्चन यांनी संसदेत दिली.