गच्छंतीपूर्वी सायरस मिस्त्री यांचा पत्नीला भ्रमणध्वनीवर लघुसंदेश अनेक कारणांमुळे टाटा ट्रस्टचा विश्वास गमावल्यानंतर राजीनामा द्या, नाहीतर बडतर्फीला तयार राहा, असे टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायप्रस मिस्त्री यांना सांगण्यात आले; तेव्हा ‘मला काढून टाकण्यात येत आहे’ (आय अॅम बिइंग सॅक्ड) असा लघुसंदेश त्यांनी पत्नी रोहिका यांना पाठवला होता ही बाब टाटा समूहाच्या एका अधिकाऱ्याने उघड केली आहे. २४ ऑक्टोबर २०१६ रोजी टाटा सन्सच्या संचालक मंडळाची बैठक सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी रतन टाटा आणि मंडळाचे दुसरे सदस्य नितीन नोहरिया हे मिस्त्री यांना हाक मारत त्यांच्याकडे आले. ‘सायरस, तुम्ही आणि रतन टाटा यांच्यातील संबंध फारसे चांगले राहिलेले नसल्यामुळे तुम्हाला टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून काढून टाकण्याचा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत मांडण्याचे टाटा ट्रस्टने ठरवले आहे,’ असे नोहरिया यांनी मिस्त्री यांना सांगितले. ही परिस्थिती लक्षात घेता एकतर राजीनामा द्या किंवा मंडळाच्या बैठकीत तुमच्या बडतर्फीच्या ठरावाला तोंड द्या, असे नोहरिया यांनी म्हटल्याचा दावा मिस्त्री यांनी स्थापन केलेल्या कोअर ग्रुप एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे (जीईसी) सदस्य असलेले निर्माल्य कुमार यांनी केला. गोष्टी या थराला पोहोचल्या असल्याबद्दल आपल्याला खेद वाटतो, एवढेच रतन टाटा यांनी टप्प्यावर सांगितले. त्यावर, ‘जंटलमेन, तुम्ही मंडळाच्या बैठकीत हा विषय मांडण्यास मोकळे आहात आणि मला जे करायचे ते मी करीन,’ असे मिस्त्री शांतपणे म्हणाले, असे कुमार यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे. यानंतर आपले जाकीट अंगावर चढवून मंडळाच्या बैठकीला जाण्याआधी सायप्रस यांनी ‘मला काढून टाकण्यात येत आहे’, असा संदेश पत्नी रोहिका हिला पाठवला, असे ‘हाऊ सायप्रस मिस्त्री वॉज फायर्ड’ या शीर्षकाने लिहिलेल्या ताज्या ब्लॉगमध्ये निर्माल्य यांनी म्हटले आहे. ते सध्या सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीतील ली कोंग चिआन स्कूल ऑफ बिझिनेसमध्ये विपणन विषयाचे प्राध्यापक आहेत.