निवडणुकीच्या राजकारणातील चाचणीत नापास झाल्याची प्रतिक्रिया दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या दारुण पराभवानंतर भाजप नेत्या किरण बेदी यांनी दिली आहे.
पराभवाची जबाबदारी घेत असल्याचे त्यांनी ब्लॉगवरील पत्रात नमूद केले आहे. अपुऱ्या वेळेतही संघर्ष केल्याचे त्यांनी सांगितले. पराभवाचे शल्य मनात ठेवून वाटचाल करण्यात अर्थ नाही, असे सांगत भविष्यात सक्रिय राहणार असल्याचे संकेत दिले होते. निकालानंतर लगेचच हा माझा नाही तर भाजपचा पराभव असल्याचे सांगत बेदी यांनी वाद निर्माण केला होता. मात्र आता पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. पत्रात त्यांनी आम आदमी पक्षावरही टीका केली आहे. आपने वीज बिल कमी करण्याचे तसेच मोफत पाण्याचे आश्वासन दिले. मात्र आयुष्यात सगळे काही मोफत मिळत नाही, असा टोला किरण बेदी यांनी लगावला. पराभवाचे विस्ताराने वर्णन केले आहे. त्यात अनेक कारणे विषद केली आहेत. केंद्रातील सरकारच्या मदतीने दिल्लीत विकास कामे करण्यासाठी राजकारणात प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.