बुधवारी अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी १२.३० वा. या ठिकाणी भूमिपूजन केलं जाणार आहे. या भूमिपूजनाबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. नियतीने माझ्याकडून रथयात्रा घडवली हे मी माझं भाग्य समजतो. प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं भूमिपूजन हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे असंही लालकृष्ण आडवाणी यांनी म्हणत कृतज्ञता व्यक्त केली आहे.

“राम मंदिर उभं राहिल्यानं आपल्या देशाची प्रतिमा जगात उंचावेल, एक बलशाली देश, भरभराट करणारा शांतीप्रिय देश अशी आपली नवी ओळख निर्माण होईल असा विश्वास वाटतो” असंही आडवाणींनी म्हटलं आहे.

अयोध्येत बुधवारी प्रभू रामचंद्र मंदिराचा भव्य भूमिपूजन सोहळा रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत दिवाळी साजरी केली जाते आहे. हे मंदिर घडतं आहे यामागे सर्वात मोठी प्रेरणा आहे ती लालकृष्ण आडवाणी यांनी काढलेल्या रथयात्रेची. १९९० मध्ये त्यांनी रथयात्रा काढली तेव्हापासूनच या क्षणाची सगळेजण वाट बघत होते.

अयोध्या प्रकरण न्याय प्रविष्ट होतं. मागील वर्षी ९ नोव्हेंबरला ऐतिहासिक निकाल देत अयोध्येतली ही जागा हिंदूंचीच आहे त्या ठिकाणी मंदिर उभं रहावं असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. त्यासाठी एका ट्रस्टची स्थापना केली जावी असंही कोर्टाने म्हटलंय. त्यानुसार आता प्रभू रामचंद्रांचं मंदिर अयोध्येत उभं राहणार आहे. या मंदिराचा भूमिपूजनाचा सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण कृतकृत्य झाल्याची भावना आणि भरुन पावल्याची भावना लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त केली आहे.

देशात सध्या करोनाची साथ आहे. संपूर्ण जगालाच हे संकट सतावतं आहे अशा वातावरणात प्रभू रामचंद्र मंदिराचा सोहळा पार पडतोय तो अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत. या कार्यक्रमाला लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी हे ज्येष्ठ नेते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत.