केंद्रीय परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या दिग्गज नेत्या सुषमा स्वराज यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी आज (मंगळवार) इंदूर येथे आपल्या आरोग्याचे कारण देत ही घोषणा केली. निवडणूक न लढण्याचा माझा विचार आहे. पण त्याबाबत पक्ष निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपाच्या प्रचारासाठी मध्य प्रदेश येथे आलेल्या सुषमा स्वराज पत्रकार परिषदेत बोलत होत्या. आपल्या धारदार वक्तृत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या सुषमा स्वराज या भाजपाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्या देशातील पूर्णवेळ पहिल्या महिला विदेशमंत्री आहेत. यापूर्वी इंदिरा गांधी यांच्याकडे काही काळासाठी ही जबाबदारी होती. त्या प्रभारी विदेश मंत्री होत्या.

दरम्यान, सुषमा स्वराज यांच्यावर २०१६ मध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी दीर्घकाळ उपचार घेतले. आपल्या मंत्रालयातील कामांवरुन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ट्विटरवरच्या जनतेच्या समस्यांची दखल घेऊन त्यांना मदत करण्यास त्या नेहमी पुढे असतात. यासाठी त्यांचे मोठे कौतुकही होते.