केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितिन गडकरी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या भाषणाचे आणि त्यातून मांडण्यात आलेल्या विचाराचे जाहीररित्या कौतुक केले आहे. नेहरुंचे भाषण आपल्याला फार आवडते, असे त्यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमात भाषणादरम्यान त्यांनी आपले मत व्यक्त केले.


गडकरी म्हणाले, जवाहरलाल नेहरु म्हणायचे भारत हा देश नाही, लोकसंख्या आहे. या देशाचा प्रत्येक व्यक्ती देशासाठी प्रश्न आहे, समस्या आहे. त्यांचं हे भाषण मला खूपच आवडतं. त्यांमुळे मी इतकं जरुर करु शकतो की, देशासमोर मी समस्या बनून राहणार नाही.

यावेळी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना गडकरी कोणाचेही नाव न घेता ते म्हणाले, सहिष्णुता भारताची सर्वांत मोठी देणं असून ही आपल्या व्यवस्थेचा एक मोठा भाग आहे. त्यामुळे एखाद्याने चुकीचं केलं तर आपणही त्याला तशीच प्रतिक्रया द्यायची ही मानसिकता ठीक नाही. नेहरुंनी म्हटले होते की, भारत एक देश नाही तर लोकसंख्या आहे. जर आपण एखाद्या समस्येवर तोडगा काढू शकत नसू तर आपल्याला या समस्येचा भागही बनता कामा नये, हे नेहरुंच भाषण आपल्याला फार आवडतं असंही गडकरी यावेळी म्हणाले.

गडकरी म्हणाले, विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट आहे. आपण सर्वांसी विनम्रतेने बोलता, चांगले बोलता. हे सर्वांना आकर्षित करु शकते मात्र, यामुळे आपण निवडणुका जिंकू शकत नाही. आपण विद्वान असून शकता, मात्र हे जरुरी नाही की लोकांनी तुम्हाला मतं दिली पाहिजेत. ज्यांना वाटतं की त्यांना सगळ कळतं त्यांचा हा समज चुकीचा आहे. आत्मविश्वास आणि अहंकार यांमध्ये अंतर आहे. आपल्याला आत्मविश्वासू असायला हवं पण अहंकारापासूनही वाचायला हवं.

निवडणुका जिंकणे चांगले आहे. मात्र, निवडणुक जिंकून जर तुम्ही लोकांच्या जीवनात बदल घडवता येत नसेल तर आपलं सत्तेत येण्याने आणि जाण्याने कोणताही फरक पडत नाही. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची आठवण काढत ते म्हणाले, सरकारे येतील जातील मात्र, देश कायम राहणार. हा देश कोणत्याही पक्षाचा नाही तर १३० कोटी भारतीयांचा आहे.