गंगा नदी मार्च २०२० पर्यंत पुर्णपणे स्वच्छ केली जाईल असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ३१ ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली होती. तर ११ सप्टेंबर रोजी बागपत येथील कार्यक्रमात बोलताना या वर्षी डिसेंबरपर्यंत ७० ते ८० टक्के स्वच्छ केली जाईल असेही गडकरी म्हणाले होते. गडकरींनी गंगा स्वच्छेतेच्या याच दाव्याच्या पार्श्वभूमीवर महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी अशाप्रकारची आश्वासने अनेक पंतप्रधानांनी दिल्याचे ट्विटवरून म्हटले आहे.

ट्विटवर खूप अॅक्टीव्ह असणारे आनंद महिंद्रा समान्यपणे राजकारण क्षेत्रासंदर्भात या माध्यमावरून प्रतिक्रिया देणे टाळतात. मात्र लाखो भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या गंगा नदी स्वच्छाता अभियानाबद्दल त्यांनी स्पष्टपणे आपले मत व्यक्त केले आहे. या ट्विटमध्ये महिंद्रा म्हणतात, प्रत्येक सरकारने गंगा नदी स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले. मला चांगले आठवतेय जेव्हा राजीव गांधी पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते त्यांनी देशाला उद्देशून एक उत्तम आणि भावनिक भाषण केले होते. त्या भाषणामध्येही त्यांनी यासंदर्भात (गंगा नदी स्वच्छता अभियानाबद्दल) काम करण्याची महत्वाकांक्षा व्यक्त केली होती. त्यावेळी ते भाषण ऐकून माझे डोळे पाणावले होते. मात्र आता नितीन गडकरी यांनी गंगा नदी स्वच्छ करण्याचा शब्द दिला आहे. आणि गडकरी तेव्हा शब्द देतात तेव्हा तो शब्द ते पाळतात यावर माझा विश्वास आहे असेही ते या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आठ दिवसांपूर्वी बागपत येथे दिल्ली-सहारनपूर राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणाचा शुभारंभ समारंभामध्ये गडकरी यांनी गंगा नदी स्वच्छेसंदर्भात माहिती दिली. गंगा नदी स्वच्छतेबाबत ते म्हणाले की, मागील चार वर्षांत केंद्र सरकारने गंगा नदीच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रीत केले होते. गंगा नदी प्रदूषित करणारे २५१ उद्योग बंद करण्यात आले आहे. तर ९३८ उद्योगांमधून निघणाऱ्या प्रदूषणावर लक्ष ठेवण्यात आले आहे. गंगा नदी प्रदूषित करणारे २११ मोठे नाले शोधण्यात आले. गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी ‘नमामि गंगा मिशन’ अंतर्गत आतापर्यंत १९५ योजनांना मंजुरी दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले होते. आता आनंद महिंद्रा यांचा विश्वास गडकरी किती सार्थ ठरवतात हे येणारा काळच सांगेल.