पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मोदींनी फेसबुकवरुन एक जुना फोटो पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या फोटोमध्ये मोदी प्रणव मुखर्जींच्या पाया पडताना दिसत आहेत.  “प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने संपूर्ण देशाला दु:ख झालं असून त्यांनी आपल्या देशाच्या विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी केलेल्या कार्यातून स्वत:ची छाप सोडली. राजकीय अभ्यासक्रम आणि समाजातील सर्व घटकांनी वेळोवेळी प्रणव मुखर्जींच्या कार्याची दखल घे त्यांची प्रशंसा केली,” अशा शब्दांमध्ये मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

८४ वर्षीय प्रणव मुखर्जी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील आर्मी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. सोमवारी सकाळी रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करत फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये गेले असल्याची माहिती दिली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण अखेर उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. यानंतर राजकीय, क्रिडा, मनोरंजन सृष्टीतील मान्यवरांनी प्रणव मुखर्जींनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

“२०१४ साली मी दिल्लीत नवीन होतो. पहिल्या दिवसापासूनच मला प्रणव मुखर्जी यांचे मार्गदर्शन, पाठिंबा आणि आशिर्वाद मिळाले म्हणून स्वत:ला भाग्यवान समतो. त्यांच्याबरोबर झालेला प्रत्येक संवाद कायम माझ्या आठवणीत राहिल. माझ्या सद्भावना त्यांचे कुटुंबिय, मित्र परिवार, हितचिंतक आणि देशभरातील समर्थकांबरोबर आहेत,” असं मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मेंदूत असलेल्या गाठीवर झालेली शस्त्रक्रिया

१० ऑगस्टपासून प्रणव मुखर्जी यांची प्रकृती बिघडली होती. १० ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान एक दिवस आधी त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. त्यानंतर ते कोमात गेले आहेत असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं होतं.

प्रणव मुखर्जींची राजकीय प्रवास

प्रणव मुखर्जी हे भारताचे १३ वे राष्ट्रपती होते. राष्ट्रीय राजकारणात ते १९६९ पासून सक्रिय होते. भारतीय राजकारणातील अमूल्य सेवेसाठी त्यांना २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात प्रणव मुखर्जी हे राजकारणात सक्रिय झाले होते. १९७३ मध्ये ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते. १९८२ ते ८४ या काळात त्यांनी देशाचं अर्थमंत्रीपद भुषवलं. १९८० ते १९८५ या कालावाधीत राज्यसभेत ते लीडर ऑफ हाऊसही होते.

इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळी काही राजकीय कारणांमुळे त्यांना थोडंसं बाजूला करण्यात आलं. त्यामुळे त्यावेळी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस हा पक्षही त्यांनी स्थापन केला होता. मात्र १९८९ नंतर त्यांनी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर प्लानिंग कमिशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जी हे परराष्ट्र मंत्री होते. २००४ मध्ये जेव्हा यूपीएचं सरकार आलं तेव्हाही ते मंत्रिमंडळात होते. २०१२ ते २०१७ या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते.