पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात लाट आली असून अनेकांनी पाकिस्तानला उत्तर देण्याचा मानस बोलून दाखवला आहे. त्यात आता चंबळ खोऱ्यातील वाघ म्हणून कुख्यात असलेला माजी दरोडेखोर मल्खन सिंह याने देखील आपण पाकिस्तानसोबत लढण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. यासाठी सरकारने आपल्याला परवानगी द्यावी, ७०० सहकाऱ्यांसह आपण सीमेवर जाऊन लढायला तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मल्खन सिंह म्हणाला, मध्य प्रदेशात आता ७०० दरोडेखोर शिल्लक आहेत. त्यांना सोबत घेऊन आपण सीमेवर जाऊन मरण्यास तयार आहोत. जर सरकारने आम्हाला परवानगी दिली तर विनाशर्त, विनावेतन देशासाठी आम्ही सीमेवर जाऊन मरण्यासही तयार आहोत. उरलेले जीवन आम्ही देशासाठी अर्पण करण्यास आम्ही तयार आहोत, जर आम्ही माघार घेतली तर नाव लावणार नाही.

मल्खन सिंह म्हणाला, आम्ही दुधखुळे नाही, १५ वर्षे लुटूपुटूचा खेळ खेळलेलो नाही. आई भवानीची कृपा राहिली तर मल्खन सिंहच्या केसालाही धक्का लागणार नाही. आमची इच्छा आहे की आम्हाला सीमेवर पाठवण्यात यावे. तसेच यावेळी आगामी निवडणुकांवरही त्याने भाष्य केले. जर मला लोकसभेचे तिकीट मिळाले तर निवडणुकीच्या रिंगणातही उतरायला मी तयार असल्याचे त्याने म्हटले आहे.

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एका कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी कानपूरमध्ये आलेल्या मल्खन सिंहने म्हटले की, निवडणूका आहेत आणि होतच राहतील, मात्र आपल्याला या हल्ल्याचा बदला घ्यायलाच हवा. जर काश्मीरवर निर्णय घेण्यात आला नाही तर कोणाचाही राजकारणावर विश्वास राहणार नाही.