पंजाब नॅशनल बँकेतील ११,४०० कोटींचा घोटाळा उघड झाल्यानंतर एका आठवड्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जनतेचा पैसा लुटणाऱ्यांना सरकार माफ करणार नाही. सरकार आर्थिक विषयांशी संबंधीत अनियमिततेविरोधात मोठी कारवाई करत असून भविष्यातही करत राहणार आहे, असे पंतप्रधानांनी शुक्रवारी ठामपणे सांगितले. ET ग्लोबल बिजनेस समिटमध्ये ते बोलत होते. पीएनबी घोटाळ्याचा त्यांनी प्रत्यक्ष उल्लेख केलेला नसला तरी याच मुद्यावर ते बोलल्याचे स्पष्ट होते.


त्याचबरोबर पंतप्रधानांनी नाव न घेता रिझर्व्ह बँकेलाही गर्भीत संदेश दिला. मोदी म्हणाले, विविध आर्थिक संस्था आणि संघटनांमध्ये नियम आणि नैतिकता तपासण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आली आहे, त्यांनी पूर्ण निष्ठेने आपली जबाबदारी पार पाडायला हवी. यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देखील निरिक्षण संस्था आणि लेखापालांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केले होते.

पंतप्रधान म्हणाले, गेल्या तीन-चार वर्षांत भारताने आपल्यासोबत संपूर्ण जगाच्या आर्थिक वाढीला मजबूती दिली आहे. IMFच्या आकड्यांनुसार २०१३ च्या शेवटी भारताचे जागतिक जीडीपीत २.४ टक्के इतके योगदान होते. त्यानंतर आमच्या सरकारच्या काळात हा जीडीपीचा दर ३.१ टक्के इतका झाला. आज कुठल्याही निकषांमध्ये जसे की महागाईचा दर, चालू खात्यातील घट, वित्तीय तूट, जीडीपी ग्रोथ, व्याज दर, एफडीआय या सर्वांमध्ये भारत चांगले काम करीत असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.