काँग्रेसची सत्ता आली तर तिहेरी तलाक कायदा रद्द करू असे आश्वासन गुरुवारी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्या नेत्या सुश्मिता देव यांनी दिली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही यावेळी मंचावर उपस्थित होते. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने दिल्लीत एक परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी राहुल गांधी यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला.

ट्रिपल तलाक विधेयक २८ डिसेंबरला लोकसभेत मंजूर झालं. आधीच्या विधेयकात सुधारणा करून हे विधेयक राज्यसभेतही मांडण्यात आलं. त्यावर दिवसभर चर्चा करण्यात आली लोकसभेत हे विधेयक ११ विरूद्ध २४५ अशा मताधिक्याने मंजूर झाले. काँग्रेसने या विधेयकाला विरोध दर्शवला आहे. या विधेयकात अनेक जाचक तरतुदी आहेत अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मांडलेल्या सूचनाही फेटाळण्यात आल्या. तर शिवसेनेने मात्र तिहेरी तलाक विधेयकावर सरकारला पाठिंबा दिला आहे. तिहेरी तलाक ही वाईट प्रथा आहे आणि ती बंद झाली पाहिजे अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. मात्र काँग्रेसची सत्ता आली तर आम्ही हे विधेयक रद्द करू अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.