त्रिशंकू विधासनभा असलेल्या कर्नाटकात राज्यपाल विजुभाई वाला यांनी भाजपाला सत्तास्थापनेसाठी पाचारण दिले असून, आज येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपालांनी त्यांना १५ दिवसांत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालायने येडियुरप्पा यांच्या शपथविधीवर स्थगिती आणण्यास नकार दिला असून शुक्रवारी सुनावणी होणार आहे. मात्र यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. ‘जर मी येडियुरप्पा असतो जर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण होईपर्यंत शपथ घेतली नसती’, असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

“मी सर्वोच्च न्यायालयाला सॅल्यूट करतो. जर मी येडियुरप्पा असतो तर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होईपर्यंत शपथ घेतली नसती”, असं ट्विट चिदंबरम यांनी केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल विजुभाई वाला यांना सत्तास्थापनेसाठी दावा करणारी जी पत्रं येडियुरप्पा यांच्याकडून पाठवण्यात आली होती, ती शुक्रवारी सादर करण्यास सांगितलं आहे. १५ आणि १६ मे रोजी ही पत्रं पाठवण्यात आली होती.

पुढे चिदंबरम यांनी म्हटलं आहे की, “येदियुरप्पा यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रातून त्यांचा दावा खोटा असल्याचं सिद्ध होईल. पत्रात कुठेही १०४ पेक्षा जास्त आकडा असल्याची नोंद नाही. राज्यपालांनी दिलेल्या आमंत्रणातही कोणता आकडा टाकण्यात आलेला नाही”.

बुधवारी भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर काही वेळातच काँग्रेस आणि जेडीएसने राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला होता. काँग्रेस आणि जेडीएसच्या मिळून ११६ जागा असून, भाजपाकडे १०४ जागा आहेत. ११२ हा निर्णायक संख्याबळाचा आकडा गाठण्यासाठी आणखी सात ते आठ आमदारांची गरज आहे.