बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारे राज्यसभेचे खासदार अमरसिंह यांनी पुन्हा एकदा आपले कट्टर राजकीय विरोधक आझम खान यांच्यावर निशाणा साधला आहे. जर जयाप्रदा यांनी ‘मी टू’ म्हटले तर खानसाहेब कारागृहात जातील, असे वक्तव्य अमरसिंह यांनी केले आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे हिंदूंसाठी असल्याचेही ते म्हणाले.

फिरोजबाद येथे हिंदू युवा वाहिनी भारतच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सध्या देशात मी टू हे अभियान सुरु आहे. जर जयापद्रा या पोलीस ठाण्यात गेल्या तर आझम खान जेल रोड निवासस्थानावरुन थेट जेलमध्ये जातील, असे अमरसिंह यांनी म्हटल्याचे वृत्त ‘जागरण’ने दिले आहे.

रामगोपाल यादव यांनी फिरोजाबादमध्ये येऊन सुरक्षित परत जाण्याचे आव्हान दिले होते. त्यामुळेच मला फिरोजाबादला येणे गरजेचे होते, असे अमरसिंह म्हणाले. लोकशाहीत हिंदुत्वाला आवाज उठवण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे फुट पाडण्याचा प्रयत्न करु नका, नाहीतर आझमसारख्या लोकांचे हात कापले जातील. सपा-बसपा आघाडीबाबत बोलताना ते म्हणाले की, सरगमसाठी सुरांची गरज असते. परंतु, सपाचे तर सूरच बिघडले आहेत.

तत्पूर्वी बुलंदशहर येथे त्यांनी आझम खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी दिल्ली ते लखनऊ यात्रेवर निघाल्याचे सांगितले. आदित्यनाथ यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या कुशल कार्यशैलीनंतरही उत्तर प्रदेश पोलीस अजूनही जुन्या पद्धतीनेच काम करत आहेत. त्यामुळेच आपल्याला आझम खान विरोधात यात्रा काढावी लागत असल्याचे ते म्हणाले.

अभिनयातून राजकारणात आलेल्या जयाप्रदा या पूर्वी सपाकडून लोकसभेवर गेल्या होत्या. नंतर त्यांनी अमरसिंह यांची साथ देत सपाला सोडचिठ्ठी दिली होती. गत निवडणुकीत जयाप्रदा लोकसभेसाठी उभारल्या होत्या. त्यावेळी आझम खान यांनी त्यांना पराभूत करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते.