बिहारमध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्तेच्या दिशेने घोडदौड सुरु आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल अशी चिन्हे आहेत. एनडीएने सत्ता मिळवल्यानंतर मुख्यमंत्रीपदावरुन पेच फसणार ? हा प्रश्न आता विचारला जात आहे. भाजपा-जेडीयू आघाडीने सत्ता मिळवल्यानंतर नितीश कुमार यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न सर्वस्वी भाजपावर अवलंबून असेल.

निवडणूक प्रचारात आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत असे भाजपाचे नेते म्हणत होते. पण बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर भाजपा मुख्यमंत्री सोडेल का? हा कळीच मुद्दा आहे. या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जेडीयूला फारशी चमकादार कामगिरी करता आलेली नाही. प्रथमच राज्यात भाजपा मोठया भावाच्या भूमिकेत जाऊ शकतो, त्यामुळे नितीश कुमार यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न भाजपावर अवलंबून असेल.

आणखी वाचा- Bihar Election Results : “राहुल गांधींनी ज्यांच्यासोबत हात मिळवला ते डुबले”

‘ब्राण्ड नितीश’ला खिंडार पडलेले नाही, प्रस्थापित सरकारविरोधातील ही एक भावना आहे असे नितीश यांच्या जवळच्या नेतेमंडळींनी या निकालाचे वर्णन केले. ‘या निवडणुकीत मोदी यांच्या प्रतिमेने आम्हाला तारले’ असे भाजपाचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय म्हणाले. “सरकार स्थापना आणि नेतृत्वासंदर्भात आज संध्याकाळपर्यंत आम्ही निर्णय घेऊ” असे विजयवर्गीय यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले.

आणखी वाचा- बिहारमध्ये जेडीयूला मागे टाकून भाजपा मोठा भाऊ बनण्याच्या मार्गावर

“जो कल आहे तसेच निकाल लागले तर नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील. आम्ही आमचा शब्द पाळू” असे विजयवर्गीय यांनी स्पष्ट केले. निवडणुकीतील जेडीयूच्या खराब कामगिरीसाठी नितीश कुमार यांच्या टीमने करोना व्हायरस आणि चिराग पासवान यांच्यावर खापड फोडले आहे.