खरं बोलणं ही जर बंडखोरी असेल तर मी बंडखोर आहे असं म्हणत अभिनेते आणि भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदींविरोधात आणि भाजपाविरोधात दंड थोपटले आहेत. कोलकाता येथे सुरु असलेल्या विरोधकांच्या महारॅलीतील मंचावर त्यांनी हजेरी लावली आहे आणि या रॅलीमध्येच त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता पक्ष त्यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दोनच दिवसांपूर्वी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना पटत नसेल तर भाजपामधून निघा अशी तंबीच दिली होती. मात्र कोणत्याही इशाऱ्यांना भीक न घालता शत्रुघ्न सिन्हा हे विरोधकांच्या मंचावर हजर राहिले आणि तिथे होय मी आहे बंडखोर असा नारा दिला. शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्ष सोडणार नाही असे म्हटले असले तरीही त्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली असाही या वक्तव्याचा अर्थ काढला जाऊ शकतो. अशात आता पक्ष त्यांच्यावर काही कारवाई करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कोलकाता या ठिकाणी ममता बॅनर्जींच्या नेतृत्त्वाखाली मोदी सरकार आणि भाजपाविरोधात महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या महारॅलीत २२ पक्षांच्या नेत्यांची हजेरी आहे. याच मंचावर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीही हजेरी लावली आहे. खरं बोलणं ही बंडखोरी असेल तर मी बंडखोर आहे असे म्हणत मी सत्याची कास धरली आहे ती सोडू शकत नाही असेही सिन्हा यांनी म्हटले आहे. तसेच मी माझ्या तत्त्वांना मुरड घालणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी नोटाबंदीचा निर्णय, जीएसटीचा निर्णय यावरही टीका केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी शत्रुघ्न सिन्हा असंही म्हणाले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी एका डेलिसोप मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीला मंत्रीपद देऊ शकतात मग मी काय वाईट होतो? अशी सगळी वक्तव्यं केली आहेत त्यात आता विरोधकांच्या मंचावरून होय मी आहेच बंडखोर असं शत्रुघ्न सिन्हा म्हटले आहेत. यानंतर भाजपा काय करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.