केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. असे असताना राम मंदिर उभारणीच्या कामात विलंब होत असल्याने संत-महंतांची चिंता वाढली आहे. राम मंदिर उभारणीच्या कामात आणखी विलंब होता कामा नये, असे त्यांचे म्हणणे आहे. २०१९ पर्यंत राम मंदिर उभारणीचे काम सुरु झाले नाही तर संत समाज आंदोलन करेन, असा इशारा अयोध्येतील दिगंबर आखाड्याचे महंत सुरेश दास यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला आहे. एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त ते लखनऊमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. ते म्हणाले, "२०१९ पर्यंत जर राम मंदिराचे काम सुरु झाले नाही तर, संत समाजाला एक निर्णायक आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय नाही. केंद्रात सध्या नरेंद्र मोदी आणि राज्यात योगी आदित्यनाथ यांचे सरकार असल्याने राम मंदिराच्या उभारणीत आता कोणतीच अडचण नाही. त्याचबरोबर राम मंदिराची निर्मिती हे भाजचे नैतिक दायित्व आहे." गोरक्षापीठाने नेहमीच राम मंदिराच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यातच सत्तेत आल्यानंतर त्यांची जबाबदारी आणखीनच वाढली आहे. ही त्यांची नैतिक जबाबदारी देखील आहे. जर यासंबंधी संवैधानिक अडचण असल्यास त्यासाठी संसदेत आणि विधिमंडळात कायदा करण्यात यावा. यापुढे कुठलीही कारणे दिलेली चालणार नाहीत, असेही ते म्हणाले.