योगगुरु बाबा रामदेव यांनी आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (एनआरसी) पाठिंबा देत देशात घुसखोरी करणाऱ्या बेकायदा निर्वासितांवर नियंत्रण आणण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी जर बेकायदा निर्वासितांना देशात राहण्याची परवानगी दिली, तर काश्मीरसारख्या अजून १० समस्या उभ्या राहतील असंही ते म्हणाले आहेत.एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी देशात चार कोटी बेकायदा निर्वासित वास्तव्य करत असल्याचा दावा केला.

ते म्हणाले की, बेकायदा निर्वासित नेहमी समस्याच उभ्या करतात मग ते पाकिस्तानी असोत बांगलादेशी, रोहिंग्या किंवा अमेरिकन. आधीच आपल्याला एक काश्मीर हाताळणं कठीण जात आहे. त्यात जर रोहिंग्यांना राहण्याची परवानगी दिली तर ते काश्मीरसारख्या अजून १० समस्या उभ्या करतील.

यावेळी बाबा रामदेव यांनी आरक्षणावरही भाष्य केलं. भारतात कायदा करण्याची गरज आहे ज्यानुसार मागास वर्गातही आरक्षण कोणाला मिळावं हे स्पष्ट होईल. ज्यांना आरक्षणाची गरज नाही त्यांचा त्यात समावेश केला जाऊ नये. मात्र समाजातील एका विशिष्ट भागाला अद्यापही आरक्षणाची गरज आहे असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.