देशात करोनामुळे चिंताजनक परिस्थिती असून, दररोज रुग्णसंख्या मोठ्या संख्येनं वाढत आहे. दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत आहे. यात करोना लढाईत पहिल्या फळीत लढणाऱ्या डॉक्टरांची संख्या मोठी आहे. देशात आतापर्यंत २०० डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननं (आयएएम) ही आकडेवारी जाहीर केली आहे. आयएएमनं यावर चिंता व्यक्त करत पंतप्रधानांनी या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशननं करोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्टरांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. माहितीनुसार देशात १९६ डॉक्टरांचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. यात मृतांपैकी १७० डॉक्टरांचं वय ५० वर्षांपेक्षा अधिक होतं. मरण पावलेल्या डॉक्टरांपैकी ४० टक्के डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर्स होते, असं आयएएमनं म्हटलं आहे.

आयएएमनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. केंद्र सरकारनं डॉक्टरांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. सर्व क्षेत्रातील डॉक्टरांना सरकारच्या वतीनं आरोग्य व जीवन विमा देण्यात यावा, असंही पत्रात म्हटलं आहे. याविषयी बोलताना आयएएमचे अध्यक्ष डॉ. राजन शर्मा म्हणाले,”आयएएम देशातील साडेतीन लाख डॉक्टरांचं प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे. त्यामुळे हे नमूद करणं गरजेचं आहे की, करोना शासकीय व खासगी क्षेत्र असा भेदभाव करत नाही आणि सगळ्यांना समानपणे प्रभावित करत आहेत,” असं शर्मा यांनी सांगितलं.

देशातील रुग्णसंख्या २० लाखांच्या पुढे

२४ तासात देशात ६१ हजार ५३७ करोनाबाधित रुग्ण आढळे आहेत. तर गेल्या २४ तासांत ९३३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाख ८८ हजार ६१२ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. देशात आतापर्यंत १४ लाख २७ हजार ६ रुग्णांवर करोनावर मात केली आहे. सहा लाख १९ हजार ९८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. आतापर्यंत ४२ हजार ५१८ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.