अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या तीन लडाखी नागरिकांना लष्कराने प्रथमच शौर्य पुरस्काराने सन्मानित केले आहे. सियाचिन भागात बर्फ हिमकडा कोसळून त्या खाली गाडल्या गेलेल्या दोन लष्करी जवानांना सुरक्षित बाहेर काढणाऱ्या हमालांचाही त्यामध्ये समावेश आहे.
गेल्या आठवडय़ात जम्मू, उधमपूर येथे लष्करी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ले.जन. संजीव चाचरा यांच्या हस्ते स्टॅनझिन पद्मा, जिग्मेट उरगेन आणि मिना नोरबू या तीन बहादुरांचा विषेश लष्करी पुरस्काराने गौरव करण्यात आला.
गेल्या वर्षी २८ मे रोजी हिमकडा कोसळून दोन भारतीय जवान त्या खाली गाडले गेले. त्यावेळी पद्मा यांनी स्वतचा जीव धोक्यात घालून बर्फाचा ढिगारा उपसला आणि दोन्ही जवानांना सुखरूप बाहेर काढले होते.
लष्करी सेवेचे स्वप्न पाहणाऱ्या जिग्मेट उरगेन याच्या डोळ्याला आणि हातांना प्रशिक्षणादरम्यान झालेल्या स्फोटात इजा झाली होती. त्यामुळे लष्करात भरती होण्याचे स्वप्न भंगले तरी लोकांना मदत करण्याचे कार्य सुरूच ठेवले. तसेच स्थानिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी लष्कराच्या मदतीने कल्याणकारी योजना राबवण्यावर ते नेहमीच भर देतात.
प्रतिकूल परिस्थितीशी सामना
पद्मा याने एक संकटसमयी आपला जीव धोक्यात घालून आपल्या साथीदाराच्या मदतीने सोपवलेली मोहीम पार पाडली होती. ५ डिसेंबर २०१२ मध्ये ट्रॉली चालवत असताना पद्माचा सहकारी निमा नोरबू हा २०० फूट खोल हिमदरीत कोसळला. त्यावेळी पद्मा याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत नोरबूला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.  
मात्र नोरबू याने २०० फूट खोल दरीत अतिशय प्रतिकूल वातावरणात तब्बल २० तास मृत्यूशी झुंज दिल्याबद्दलही त्याचा लष्कराने गौरव केला.