दि्ल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि मेट्रो रेल्वेचे कौतूक करत दिल्ली विधानसभा निवडणूकीत काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. दिल्लीमधील एका प्रचारसभेस राहुल गांधी संबोधित करत होते. या सभेसाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षितही उपस्थित होत्या.  दिल्ली येथे ४ डिसेंबर राज्य निवडणूक होणार आहे.
दिल्ली मेट्रोचे काम जकार्ताच्या धर्तीवर सुरू असल्याचे सांगत,  या सभेतही राहुल गांधी यांनी गरिबांची मदत फक्त काँग्रेसच करु शकते असा दावा केला. ते म्हणाले, ‘दिल्लीतील जनतेच्या गरजा फक्त काँग्रेसलाच कळू शकतात. आरोग्याच्या सुविधा पाहिजे, युवकांना रोजगार हवा आहे त्यामुळेच काँग्रेसचे धोरण सर्वसामान्यांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केले गेले आहे.’  शीला दीक्षित यांच्या कामाचे कौतुक करताना ते म्हणाले, ‘त्यांनी दिल्लीचा कायापालट केला आहे.’  दिल्लीमधील स्थलांतरितांना, गरीबांनाही कॉंग्रेसने मदत केली आहे,” असे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. अन्नसुरक्षा कायद्यावर विरोधक टीका करत असल्याचे सांगत ते म्हणाले, विरोधीपक्ष विचारत आहे की, यासाठी पैसा कुठे आहे. तर आम्ही त्यांना या कायद्याची अंमलबजावणी करून दाखवणार आहोत आणि पैसाही खर्च करून दाखवू.