हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीरमध्ये हल्ल्याचा कट रचला होता अशी माहिती जम्मू आणि काश्मीरचे मुख्य सचिव बी.व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी पत्रकार परिषदेत दिली. सीमाभागात सुरु असलेल्या दहशतवादी कारवाया नियंत्रणात आणण्यासाठीच आम्ही राज्यात अनेक प्रकारचे निर्बंध लादले होते. आज रात्रीपासून टेलिफोन सेवा पूर्ववत होईल तर सोमवारपासून शाळा आणि महाविद्यालयंही उघडतील असंही सुब्रमण्यम यांनी स्पष्ट केलं. अनुच्छेद ३७० हटवण्याचा निर्णय घेण्याच्या दोन दिवस आधीपासून जम्मू काश्मीरमध्ये विविध प्रकारचे निर्बंध लादण्यात आले होते. ते आता हळूहळू उठवण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं.

 

जम्मू आणि काश्मीरमध्ये परिस्थिती पूर्ववत होईल यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचंही  सुब्रमण्यम यांनी स्पष्ट केलं. आज रात्रीपासून टेलिफोन, इंटरनेट सेवाही टप्प्याटप्प्याने सुरु होतील असंही त्यांनी म्हटलं आहे.

सध्या जम्मू काश्मीरमधल्या २२ पैकी १२ जिल्ह्यांमध्ये शांतता आहे. ५ जिल्ह्यांमध्ये काहीसा तणाव आहे. मात्र या पाच जिल्ह्यांमधला तणाव निवळण्याच्या दृष्टीनेही आम्ही पावलं टाकतो आहोत. टेलिफोन आणि इंटरनेट सेवा टप्प्याटप्प्याने सुरु केली जाईल, तसेच सरकारी कार्यालयं आता सुरु करण्यात आली आहेत. सोमवारपासून शाळा आणि महाविद्यालयंही उघडतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.