कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतरही भाजपाने पुन्हा सरकार स्थापन करण्याची आशा सोडलेली नाही. सत्ताधारी पक्षातील काँग्रेस-जेडीएसच्या नाराज आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरु आहेत. काँग्रेस-जेडीएसमधील नाराज आमदारांशी संपर्क साधा आणि त्यांना भाजपामध्ये घेऊन या, देशाच्या विकासासाठी ते गरजेचे आहे असे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुरप्पा शुक्रवारी म्हणाले. ते पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.

काँग्रेस-जेडीएस सरकारचा पाचवर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी भाजपा पुन्हा सत्तेमध्ये येईल अशी येडियुरप्पा यांना अशा आहे. कर्नाटकच्या जनतेने भाजपाला कौल दिला होता. त्यामुळे आपण पुन्हा सत्तेमध्ये येऊ अशी लोकांना अपेक्षा आहे. पक्ष आणि २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाची दावेदारी अधिक बळकट करण्यासाठी मी पक्षाच्या नेत्यांना विनंती करतो कि, त्यांनी काँग्रेस-जेडीएसमधील जे नाराज आमदार आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना भाजपामध्ये आणावे. ज्यांना कर्नाटक आणि देशाच्या विकासाची काळजी आहे त्याचे आम्ही स्वागत करु असे येडियुरप्पा म्हणाले.

तूर्तास भाजपा संयम दाखवेल. सरकार अस्थिर करण्याचा कोणताच प्रयत्न करणार नाही असेही त्यांनी सांगितले. अर्थसंकल्प सादर होईपर्यंत वाट पाहू त्यानंतर पुढचे पाऊल उचलू असे येडियुरप्पा म्हणाले. काँग्रेस-जेडीएस आघाडीमध्ये वाद वाढत चालले असून कालच एचडी देवेगौडा यांनी काँग्रेसला सूचक इशारा दिला होता.

आमच्या पक्षाला गृहित धरु नका असे जेडीएसचे सर्वेसर्वा एचडी देवेगौडा म्हणाले. मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळयाला सहा पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित असले तरी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षांनी एकत्र निवडणूक लढणे गरजेचे नाही असे देवेगौडा नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मे महिन्यात बंगळुरुमध्ये कुमारस्वामी यांचा शपथविधी झाला. त्यावेळी काँग्रेस, तृणमुल काँग्रेस, बसप, आप, सीपीएम आणि टीडीपीचे प्रमुख नेते उपस्थित होते.