राफेल कराराची संसदेत जेव्हा केव्हा चौकशी होईल त्यावेळी दोन नावं पुढे येतील ती लिहून ठेवा. नरेंद्र मोदी व अनिल अंबानी असं सांगत काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी मोदींवर घणाघाती हल्ला चढवला. पत्रकार परिषदेत बोलताना गांधी यांनी अनिल अंबानी व नरेंद्र मोदी हे मित्र असून अंबानींचं भलं करण्यासाठी त्यांचा ३० हजार कोटी रुपयांचा फायदा करण्यासाठी राफेल करार केल्याचा आरोप पुन्हा केला. मोदींवर आरोपांची जंत्री सादर करताना गांधी म्हणाले की सुप्रीम कोर्टानं राफेलसंदर्भात किमतीचा उल्लेख करताना कॅगकडे या किमती असल्याचे व पीएसीकडे या किमती असल्याचे सांगितले. परंतु मल्लिकार्जुन खर्गे या पीएसीचे अध्यक्ष असून त्यांना यातलं अक्षरही माहित नसल्याचे सांगितले व तसे खर्गे यांच्याकडूनही वदवले. यामुळे पीएसी ही मोदींच्या कार्यालयात किंवा फ्रान्सच्या संसदेत आहे का अशी कुत्सित टिप्पणीही त्यांनी केली आहे. राफेल करारासंदर्भात जॉइंट पार्लमेंटरी कमिटीची व चौकशीची आपली मागणी कायम असल्याचे ठामपणे सांगत गांधींनी ज्यावेळी ही चौकशी होईल त्यावेळी ३० हजार कोटींचा घोटाळा उघड होईल आणि त्यावेळी दोन नावं समोर येतील नरेंद्र मोदी व अनिल अंबानी असा आरोप केला. राफेल व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा कोणताही पुरावा नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोदी सरकारला क्लीनचीट दिली. पण राफेल व्यवहारात भ्रष्टाचार झालाच आहे असा दावा राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मित्र अनिल अंबानींना मदत केल्याचा मी सिद्ध करुन दाखवीन असे राहुल म्हणाले. ५२६ कोटी रुपयांवरुन प्रत्येक विमानाची किंमत १६०० कोटी रुपये कशी झाली ? हा आमचा साधा प्रश्न आहे. राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना चौकीदार चोर हैं या आपल्या आरोपाचा पुनरुच्चार केला. कॅगचा अहवाल हा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा पाया आहे. पीएसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सुद्धा हा रिपोर्ट पाहिलेला नाही. त्यामुळे खरोखरंच मला सर्व हे समजत नाहीय असे राहुल गांधी म्हणाले. ज्या दिवशी जेपीसी चौकशी होईल तेव्हा सरकाराचा पर्दाफाश होईल असे राहुल म्हणाले. एचएएलकडू हे कंत्राट का काढून घेतले ? भारतीय युवकांची रोजगाराची संधी का घालवली ? असे प्रश्न त्यांनी विचारले. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांची कर्जे आम्ही माफ करणार आहोत असे राहुल यांनी यावेळी सांगितले.