राजस्थानात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये भाजपाने अजूनही आपले पत्ते उघड केलेले नाहीत. पडद्यामागून भाजपाचं सचिन पायलट यांना पाठबळ देत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. दरम्यान काँग्रेस सचिन पायलट यांचा राग शांत करुन, त्यांना पुन्हा आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपाने तूर्तास ‘ऑपरेशन डेझर्ट’ स्थगित करुन वेट अँड वॉचची भूमिका घेण्याचे ठरवले आहे.

सचिन पायलट यांचे पक्षात नेमके स्थान काय? त्यांना किती आमदारांचा पाठिंबा आहे? यावर स्पष्टता येईपर्यंत भाजपाने सबुरीचे धोरण स्वीकारले आहे. या ‘ऑपरेशन डेझर्ट’बद्दल इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.

सचिन पायलट यांचे पक्षात नेमके स्थान काय? आणि त्यांना किती आमदारांचा पाठिंबा आहे? हे स्पष्ट होत नाही, तो पर्यंत ‘ऑपरेशन डेझर्ट’पुढे न्यायचे नाही असे ठरले आहे. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानेच इंडिया टुडे टीव्हीला शुक्रवारी ही माहिती दिली. भाजपाने अजूनही अशोक गेहलोत यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करायला सांगितलेले नाही.

आणखी वाचा- मागच्या दीड वर्षापासून आम्ही बोलत नव्हतो, पण पायलट परत आले तर त्यांना मिठी मारेन – अशोक गेहलोत

राजस्थानची तुलना मध्य प्रदेशशी करता येणार नाही. इथे नंबर गेममध्ये फरक असून भाजपाची अंतर्गत समीकरणही वेगळी आहेत, असे भाजपामधील अंतर्गत सूत्रांनी सांगितले. राजस्थानमधील राजकीय भूमिका ठरवण्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या हेच ऑपरेशन डेझर्ट स्थगित केल्याचे संकेत आहेत.

राजस्थान काँग्रेसमध्ये सचिन पायलट यांनी बंड केले, तेव्हा राजस्थानातील भाजपाच्या शक्तीशाली नेत्या वसुंधार राजे त्यांच्या ढोलपूर येथील घरी होत्या. त्यांना जयपूर येथे पोहोचण्यास सांगण्यात आले. पण त्यानंतर काहीही ठरलेले नाही. त्या झालावाड येथील आपल्या मतदारसंघात निघून गेल्या. पण त्यांनी राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर काहीही भाष्य केलेले नाही.

आणखी वाचा- राजस्थान: “काँग्रेस व्हेंटिलेटरवर, प्लाझ्मा किंवा रेमडेसिवीरही त्यांना वाचवू शकत नाही”

मागच्या दीड वर्षापासून आम्ही बोलत नव्हतो – अशोक गेहलोत
“राजस्थानात आमचे सरकार स्थापन झाल्यापासूनच सचिन पायलट ते सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते तसेच मागच्या दीड वर्षांपासून आमच्यात कुठलाही संवाद नाहीय” असे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी सांगितले. “मंत्री त्याच्या मुख्यमंत्र्याबरोबर बोलत नव्हता, तसेच कुठला सल्लाही घेत नव्हता. आमच्यात कुठलाही संवाद नव्हता. लोकशाहीमध्ये प्रतिस्पर्धीही परस्परांशी बोलतात. लोकशाहीमध्ये संवाद महत्त्वाचा आहे” असे अशोक गेहलोत एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

“आपल्याला टार्गेट केलं जातंय असं पायलट यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि विनाकारण SOG ने पाठवलेल्या नोटीसला मुद्दा बनवला. १० ते १२ आमदारांना नोटीस बजावली होती” असे गेहलोत म्हणाले. “भाजपा आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करतेय, अशी तक्रार आमच्या पक्षाने SOG कडे केली. आम्ही कुठेही त्यांचे नाव घेतले नाही. पण तेच स्पष्टीकरण देत होते. ते का स्पष्टीकरण देत होते, ते आता समोर आलंय” असे गेहलोत यांनी सांगितलं.